दैनंदिनी – १८ एप्रिल २०१३ (संक्रमण)

कधी अंधारुन आल्यावर वा आभाळातील मळभ असताना बाहेर पडल्यानंतर अचानक पाऊस पडून जातो.. सारे मळभ दूर होते अन् समोर लख्ख प्रकाश दिसू लागतो… डोळे तेच पण नजर बदलून जाते… समोर असणारा अन् खुंटत जाणारा सगळा परिसर एकदम आवाक्याबाहेर जाऊन विस्तीर्ण होऊ लागतो… आपल्या अमर्याद कक्षांमध्ये येण्यास त्याचा एक अविभाज्य भाग होण्यास आव्हान देऊ लागतो… एका मानसिक परिवर्तनानंतर सुद्धा कित्येकदा अशाच भावना मनःपटलावर दाटून येतात.. मनातील मळभ नाहीसे होणे.. किंवा एखाद्या आगंतुक क्षणाला त्या बदलाची परिणती अनुभवणे सुद्धा अजबच ना!! मोकळे होणे किंवा बिनधास्त होणे कधीही महत्वाचे… बर्‍याचदा आपणच आपल्याला खुराड्यात बंद करून घेतो… अगदी एखाद्या चिंचोळ्या अरुंद नळकांडीप्रमाणे.. दोन्हीबाजूला मोकळेपणा पण मध्ये तो असंकुचितपणा किंवा एक घुसमट… जगताना या गोष्टींची सोबत असेल तर प्रगती नाही तर अधोगती होणार यात काही वादच नाही म्हणूनच या सगळ्यांना झुगारून, पंख फडफडवून एखाद्या उंच शिखरावर वार्‍याच्या उलट दिशेने सार्‍या जगाला न्याहाळणे निराळेच… येणार्‍या बदलाला सामोरे जाणे जेवढे महत्वाचे तेवढेच किंवा कदाचित त्याहीपेक्षा किंचित महत्वाचे म्हणजे तो बदल स्वीकारणे होय…

रोजच्या रहाटगाड्यात स्वतःला इतकं अडकवून घेतल्यानंतर बदल, संक्रमण असे शब्द नको वाटतात जगाला, स्वतःच अहं स्वतःच्याच भोवती मोठं वेटोळं निर्माण करून घेतो अन मग एखाद्या भुंग्याप्रमाणे आपण त्यात अडकून जातो ते कधीही न सुटण्याकरताच! अन यासाठीच बदल महत्वाचा… नेणीवेकडून जाणीवेकडे नेणारा तो राजमार्ग महत्वाचा.. कधी कळत अन कधी नकळत स्वतःला त्या काळाच्या स्वाधीन करायला आपल्यालाही तर जमायलाच हवे… ते तेव्हाच जमेल जेव्हा आपण हातचं काही राखून नाही ठेवणार.. मोकळे असू अगदी एखाद्या लख्ख काचेप्रमाणे आरपार! परिस्थिती आपल्याला घडवत असते… आपल्यातूनही एखादे लाजवाब शिल्प साकारू शकते याचा आपल्यापेक्षा जास्त विश्वास त्या परिस्थितीला त्या काळाला असतो हेच खरे… याच काळानेच तर आपल्याला पहिल्यांदा चालायला अन नंतर धावायला शिकवले… अगदी लहानपणी असलेला मातीचा गोळा कधी दगड झाला हेदेखील आपल्याला कळाले नाही… त्यातील अहं इतका कधी मोठा झाला की येणारे आश्वासक बदल झुगारणे त्याला जमू लागले… अन म्हणूनच जर घडायचे असेल तर आता त्या काळाच्या सामोरे बिनदिक्कत जायलाच हवे… शिल्प घडणार तर टवके उडणारच.. वेदना होणारच.. फक्त एवढाच विश्वास हवा की हे टवके नको असलेल्या त्या अहंकाराचे आहेत… अविश्वासाचे आहेत!

एखाद्या नवीन मार्गावर पुढारणे किंवा समोर कोणताही मागोवा नसताना पुढे चालणे म्हणजेच धाडस किंवा स्वतःतील आत्मशक्तीवरील अतोनात विश्वास! वाट नसताना वाट काढणे अन् वाट तयार करणे हे सगळ्यांना जमतेच असे नाही….महाकाय समुद्रातून पलिकडे जाण्यासाठी सेतू बांधणे सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी श्रीरामाचा ध्यास हवा, मारुतीची गगनभेदी इच्छाशक्ती हवी, वानरसेनेचा तो निरागस पण अतोनात भक्तीभाव हवा… त्या खारुताईची धडपड अन भक्ती हवी.. शबरीचा भोळाभाव अन आपलेपणा हवा! खलाश्याला गलबत भर समुद्रात आल्यानंतर धीर गाळून चालत नाही.. तेव्हा परतीचा मार्ग नसतो… येणार्‍या वार्‍याशी झुंजायचे, समुद्राला कवटाळायचे अन त्यावरच स्वार व्हायचे असते… हे ज्याला जमेल त्यानेच नवीन मार्ग शोधण्याच्या फंदात पडावे अन्यथा आपला धोपटमार्ग बरा!!!

“तुतारी”

वळणांची वाट गरगरणारी,
फिरुनी येते पुन्हा माघारी
नजर वेंधळी घुटमळणारी,
सुरुवातीचे ते कौतुक भारी!

आत डोकवा, येते शिसारी,
घाटाघाटांची गम्मत न्यारी!
कधी झटका, मध्येच उभारी,
चांदण्यानीच थाटली पथारी!

हुंदक्यांची ती भाषा बिलोरी,
काळजांच्या आरपार कट्यारी!
सोबतीचे जाम, आठवांची यारी,
जणू,जिभेवर चिंच विरघळणारी!

मदमस्त कलंदर तो पुकारी,
कोण नाचती नी, कोण मदारी?
कुठले आप हे? कुठले शेजारी,
भाव द्या चेहर्‍याला, व्हा रंगारी!

झटावे नशिबाने रोजच बाजारी,
म्हणे नशिब तुझे देशील उधारी?
बुरुजावरुनी वाजू द्या तुतारी,
येता आम्ही, कफल्लक भिकारी!

-निलेश सकपाळ, २० फ़ेब्रुवारी, २०१३

संग-असंग

संग-असंग

काळोखाचे घेऊन हात,
उजेडाचे पांग फेडावे
आभाळाला देऊन कान,
परलोकाचे ध्यान करावे…

उडता येते कोणाला,
पाताळातही रुतताना..
आभासाचे घेऊन सोंग,
उत्थानाचे नाट्य घडावे..

विचारांची स्पर्धा कसली,
भावनांचे बंड असताना…
अदृश्याचे जोडून बिंदू,
निर्गुणाचे रूप दिसावे…

गुंततात मने केव्हातरी,
एखादे कोडे उकलताना..
हातच्याचे राखून भान,
विश्वासाचे नाते जडावे…

असंग सार्‍या बाजुला,
निसंगाचे भेद सुटताना
आसक्तीचे गळून पान,
संवादाचे रोप फुटावे…

निलेश सकपाळ, १७ जानेवारी २०१३

संग-असंग

जूस्त-जू

जूस्त-जू

शब्दोंका कारण दे नहीं मन मेरे…
सच तो यह है… के तू बहना भूँल गया…

भगवानसे कहता दर्शन दुर्लभ तेरे….
सच तो यह है… के तू झुकना भूँल गया…

मुझसे मेरी रंजिशोंकी कसम ना दे…
सच तो यह है… के तू मनाना भूँल गया…

हासील ढुँढता रहेगा जन्नतमें सारे…
सच तो यह है… के तू लुटाना भूँल गया…

झूँठी तसल्ली, झूँठे है तराने तेरे..
सच तो यह है.. के तू सच जताना भूँल गया…

हवेलींयोकें दालानों का सन्नाटा तू मांगे…..
सच तो यह है.. के तू चिल्लाना भूँल गया….

लिखेगा नाम हर कागज के पन्ने पन्ने पे…
सच तो यह है.. के तू ‘मैं’ को मिटाना भूँल गया….

——निलेश सकपाळ, १६ जानेवारी, २०१३

प्रवाहविभोर!!! : २४ जुलै २०११

बंधनांना झुगारुन, बंधनांशी झगडुन की बंधनांना स्वीकारुन! निर्णय तुमचा अन माझा असतो… तिथुन निवडलेला मार्गही तर मग आपापलाच असतो… नियतीच्या पटावरील पुढची चाल माहीत नसली, तरी कुतुहलापोटी फासे खेळण्याचे धाडस बरेच जण करतात, अगदी बिनधास्त!! भावनांच्या आधीन होऊन मग भावनांशीच प्रतारणा का करावी, आभाळाच्या सावलीखाली राहून आभाळालाच जखम का करावी, एखादी लांबसडक पाऊलवाट कधीच संपणार नाही याची शाश्वती कोण देतो? जर कुणीच देत नाही तर आपण आजनंतर उद्या अन उद्यानंतर परवा घरंगळत त्या भविष्याच्या मागे का धावतो? क्षितीजाशी मैत्री केली तर त्याचे नसणे स्वीकारावेच लागते, अन ते स्वीकारले नाही तर मग जखमा होतात अन त्याही न दिसणार्‍या, न भरणार्‍या, अगदी क्षितीजाप्रमाणेच निरंतर चिरकाल अस्तित्वाचा हक्क सांगणार्‍या!

धरती हादरली, वादळ घोंघावले, समुद्र उधाणला कीच आपल्याला यांच्या अस्तित्वाची जाणीव होते… नव्हे नव्हे त्यांच्या आपल्या जवळ असण्याचीसुद्धा अनामिक संशयी भीती वाटते… जसे आपल्या मनात काहूर माजले तर आपल्या वागण्यावरून आपला ताबा सुटून जातो…मनातल्या या खळबळीचा थांगपत्ता लागत नाही तोपर्यंत किंवा कदाचीत जोपर्यंत उठणार्‍या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत…. मग या धरतीने, वादळाने अन या समुद्राने कसे काय उत्तर शोधावे.. त्यांच्यातील खळबळीचा कुणी व कसा समाचार घ्यावा? त्यांच्या उच्छादामागील घाव अन त्या घावामागील भाव कोणत्या सजीव मनाला उमजावे? की सजीव मनाची व्याख्या यांच्या दुःखापलिकडेच संपत असावी अन्यथा कोणी वडाच्या झाडाला आधार घेत पसरणारा वेल तोडला नसता अन बाजारभावामध्ये विकला जाणारा कृत्रिम वेल शोभेसाठी घेतला नसता! माझे काय अन कुणाचे काय निसर्गाच्या ओसरीवर पाय पसरून बसायला थोडी का परवानगी लागते, पानाच्या गालावरील नकळत सुटलेला तो पहाटेचा दवबिंदू अलगद आठवणीच्या शिंपल्यामध्ये वेचायला मात्र नशीब लागते हेच खरे!!

पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै २०१०

कधीतरी पावसात भिजवून मन रमवणारे पाऊसवेडे चातक बरेच आहेत… अगदी रोजच्या घडीला कितीतरी वेळा हे असे पाऊसप्रवासी नजरेसमोर मुसळधार पावसामध्ये विरघळताना दिसत असतात… कुणी आपल्या संसाराच्या गाठोड्याला खांद्यावरून त्याची होडी करुन पाण्यामध्ये सोडून देतो तर कुणी उद्या काय होणार या सामान्य प्रश्नाला कवटाळून पावसामध्ये आपले चिंतांचे कापसी ओझे भिजवून रस्त्यावरून सरपटताना दिसतो… कुणी पक्षी अगदी झाडाच्या कोवळ्या फांदीवर बसून आपले अधिराज्य गाजवताना दिसतो तर त्याचवेळेला या निसर्गाच्या नव्या नवलाईला दूर सारून डांबरी रस्त्यावर एखाद्या नव्या खड्ड्याच्या तक्रारीमध्ये त्रासलेला एखादा बुद्धिमान प्राणी दिसतो… कुठे एका बाजूला पांडुरंगावर सगळा भार सोपवून त्याच्या नामघोषामध्ये या पावसाचा टाळ करुन, या पावसाचा मृदंग करुन, या पावसाचा अभंग करुन त्या विठुमाऊलीकडे निघालेली यात्रिकांची आषाढवारी दिसते..

गेल्या पाच सहा वर्षामध्ये भारतातला पाऊस अनुभवला नव्हता.. जो काही होता तो फक्त बातम्यांमधून अन इथल्या फोटोंमधून.. यावेळी मात्र अगदी दूर गेलेल्या जुन्या मित्राप्रमाणे कडकडून गळ्यात पडला… त्याच जुन्या त्वेषामध्ये अन त्याच त्याच्या नेहमीच्या तालामध्ये… जणू काही सांगत होता की बघ या एकाच निसर्गामध्ये तू अन मी दोघे जगत आहोत, पण मी अजून तसाच मुक्त, मोकळा कोसळतो… अन तू दिवसेंदिवस एखाद्या जुन्या तलावाप्रमाणे आटत आटत चाललायस…. सार्‍या विश्वाला सताड बाहुंनी गवसणी कशी घालायची हे मात्र शिकावं ते या पावसाकडूनच… तो ना घड्याळाच्या काट्याला बांधलेला असतो ना तो कोण्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीभोवती घुटमळत असतो… वर्षभराचे मळभ साचलेल्या आपल्या नजरा, आपले कोते झालेले दृष्टिकोन पुसून टाकण्यासाठी, धुवून टाकण्यासाठीच हा देवदूत आपल्याकडे झेपावत असेल… त्याचा ओला संदेश घेऊन माती सुगंधित होते.. त्याच्याकडून जीवन घेऊन कितीतरी नवी रोपटी आकाशाचे स्वप्न जोपासू लागतात… अन त्याचवेळेला आपल्यातला माणूस मात्र या पावसाचे आभार मानण्याचे विसरून जाताना दिसतो हीच ओली खंत मनामध्ये अंकुरत रहते…

अजूनही दैनंदिनी लिहावी की असंच जेव्हा वाटेल तेव्हा लिहावे हे काही केल्या नक्की होत नाहीये… लवकरच काहीतरी निर्णय व्हावा हीच अपेक्षा… विचारांशी प्रामाणिक राहणे जमावे.. उठणार्‍या प्रत्येक भावस्पंदनाला त्याच्या हक्काचे आभाळ देता यावे म्हणुन आणखी कसोशीने यत्न करावे… खळबळ वा उफाळणारा अग्नीचा समर्पक सार्थ बहुमान कराता यावा…. भ्रष्ट व कुनीतीपुर्वक काळवंडणार्‍या ढगांना क्षितीजापलिकडे दूर ढकलता यावे….. अन यानंतर उभ्या राहणार्‍या सुसंवादासाठी शब्दांना साकडे घालणे मात्र असेच सुरु राहील!!!

Follow

Get every new post delivered to your Inbox.