तेजोमय

समर्थे समर्थ करावे। तरीच समर्थ म्हणवावे। त्रैलोक्यास पडे ठावे। सामर्थ्य जयाचे॥ – समर्थ रामदासस्वामी

दैनंदिनी – १९, २०, २१ आणि २२ सप्टेंबर २००९

leave a comment »


मित्रहो, काहीही झाले तरी जगणे नाकरता येत नाही! सुंदर सुंदर फुलांमधुन जाणारी वाट कधी अचानक रखरखीत वाळवंटात येते, सोनेरी भविष्याचे तुषार मृगजळाप्रमाणे अशक्यतेच्या ढगामध्ये विरघळून जातात, नेहमीचे आश्वासक वाटणारे हिंदोळे, उमाळे खोल हृदयाच्या गूढगर्भामध्ये नामशेष होऊन जातात, आपले आपले वाटणारे प्रतिबिंब आपल्याकडे पाठ करून उभे राहते, प्रकाशाचा अन सावलीचा ताळमेळ बसत नाही, उडणार्‍या पाखरांना आकाश नाकारून जाते, एखादी आयुष्याची ओळ पान सोडून पानाबाहेर भरकटून जाते, जीवनाच्या दाराचे कुलुप काही केल्या उघडत नाही, डोके आपटूनही पलिकडून कोणी आवाज देत नाही, चावी कुलुपामध्ये फिरवताना अचानक अर्ध्यात तुटून जावी.. लोळ भावनांचे मनावर आदळून काचेप्रमाणे क्षणात तुटून जावे,  अंगावरुन निथळताना आपण निराकार होऊन पहात रहावे.. आपल्या ठिकर्‍या उडताना आपण प्रेक्षक व्हावे व नंतर तेवढ्याच निराकारपणे सगळ्या ठिकर्‍या जमवून पुन्हा स्वतःला एका आकृतीमध्ये बांधावे… देहभावनेच्या चौकटीत अजून आपले अस्तित्व उरले आहे याची जाणीव होऊन पुन्हा नव्या वणव्यासाठी इंधन म्हणून जगत रहावे… ठिणग्यांचा दोष नाही, ज्वाळांचा काही दोष नाही, आता जगण्याचे चटके जाणवत नाहीत, अंगापिंडावर एखाद्या लहान मुलाला मनसोक्त खेळवावे त्याप्रमाणे या अघोरी वादळांना, वणव्यांना खेळवत आहोत असे वाटायला लागले आहे…. कदाचित समुद्र मंथन झाल्याशिवाय अमृताचा घडा मिळणार नाही.. आमचेही असेच काही सुरु असावे.. या मंथनाला सामोरे जाण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय आमच्या भात्यात नाही… यात जाताना एकसंध राहणे व यातून परतताना स्वतःला एकसंध राखणे एवढेच काय ते आमच्याकडे आहे अन त्या विश्वविधात्याच्या कृपाशीर्वादाच्या विश्वासावर आम्ही यातूनही तरून जाऊ असा विश्वास वाटतो, नव्हे नव्हे तो आहेच!

शून्यांची बेरीज शून्य! शून्यांचा गुणाकर शून्य! शून्यांची वजाबाकी शून्य! मात्र शुन्यांचा भागाकार अनिश्चित! या शून्याचेही असेच काहीसे झाले गेल्या चार दिवसात! मित्रहो, अनिश्चितता, अनियमितता ही शब्दात खुप आटोपशीर असते नाही, पण जेव्हा शब्द सोडून ती वास्तवात असते तेव्हा बिलकुल आटोपशीर नसते.. हे अनुभवणे म्हणजे स्पंदनांचे ठोके एखाद्या घणाच्या आघाताप्रमाणे छाताडामध्ये आदळणे, पापण्यांचे फडफडणे म्हणजे या जगात आहोत की नाही या झुल्यावर झुलणे, श्वासांतून उकळता लाव्हारस अंतरंगात फिरणे, उच्छवासातून वातावरणाला गढुळ करणारे विषारी वायू निसटणे, डोळ्यांतील पाण्याला कुजकट, किळसवाणा दुर्गंध येणे!! … पावलांचे एका जागी रुतून पुतळ्याप्रमाणे ठप्प होणे, संवेदनांच्या पलिकडे जाऊन आपण न व्यक्त होणारी एक संवेदना होऊन जाणे, कुत्सित नजरांमधून छद्मी, जीव्हारी  भाल्यांचे हल्ले होणे काय असू शकते हे अनुभवणे म्हणजे आमचे गेले चार दिवस होते…

देव आहे हे अनुभवायचे असेल तर काय करायचे? देव असेल तर मग जगात ही अंदाधुंदी का आणि कशाला? जेवढी अंदाधुंदी आहे कदाचित त्यात टिकून राहणे, त्यात वाहुन न जाणे, स्वतःला त्यातूनही वेगळे राखणे म्हणजेच देव आहे सिद्ध होत नाही का? जर देव नसता तर समाजावर काळाच्या आकांडतांडावाचे निर्विवाद वर्चस्व पाहीजे होते पण तसे नक्कीच नाही.. आपल्याला यातूनही वेगळे राहता येते किंवा याची ओळख घेता येते म्हणजेच आपल्या आतमध्ये त्या चांगल्या शक्तीचे अधिष्ठान निश्चितच आहे हे नक्की!! या अधिष्ठानाप्रती जर विश्वास वाढवला तर नक्कीच या काळ्या साम्राज्यापासुन स्वतःला वेगळे राखता येईल.. जेवढे आपण सात्विक वा शुद्ध होण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच जोरात या काळ्या शक्तीचा आघात आपल्यावर होत असतो… तेव्हा आपली इच्छाशक्ती पूर्णपणे एकवटली गेली पाहीजे, पूर्ण विश्वास त्या विधात्याप्रती एकवटला पाहीजे.. तेव्हाच जर आपण त्या विधात्याच्या असण्यावर संशय घेतला तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच! कदाचित ही भाषा बर्‍याच जणांना बाष्कळ व तोंडाची वाफ वाटेल.. पण मित्रहो, याला प्रत्यक्ष अनुभवाची किनार आहे हे ठामपणे आम्ही आता नक्कीच सांगू शकतो… आधी अनुभवले अन मग लिहीले वा त्या विधात्यानेच हे लिहून घेतले असावे! कुणास ठाऊक या शब्दांमार्फत त्याला तुमच्यापर्यंत पोहचायचे असेल!!

काय सांगावे अन काय न सांगावे… एका बाजूला ढासळेलेले भौतिकाचे बुरुज आहेत तर दुसर्‍या बाजूला अभौतिकाच्या अनुभूतीतून मिळालेले प्रचंड बळ आहे! समाजाकडून असे काही अनुभव गाठीला येतात की ते पुन्हा कधीच आठवावेसे वाटत नाहीत.. या गेल्या चार दिवसातले अनुभवही असेच होते… पुन्हा त्या वळणावर जाणे नाही… ज्यांनी कुणी तेव्हा दरीत ढकलले त्यांच्याबद्दल मनात घृणाही नाही.. फक्त एकच सदिच्छा आहे की पुन्हा कधी हे ढकलणे आणखी कुणाबाबतीत त्यांच्याकडुन न होवो! नुकत्याच आकाश पाहिलेल्या रोपट्याला मुळासकट उखडताना त्या न फुललेल्या मुक रोपट्याला काय वाटत असेल हे प्रत्यक्ष अनुभवले! … पंख फैलावून उडण्यासाठी एखाद्या दरीच्या टोकावरून आकाशात झेप घ्यावी व कळावे की हे पंख नकली आहेत, फसवे आहेत व काही कळायच्या आत जमिनीवर कोसळणे काय असते याचा अंदाज घेता आला या चार दिवसात! … त्याच वेळेला दुर्लभ असणारे, अदृश्य असणारे आंतरीक बळ या ब्रह्मांडातून आपल्या आतमध्ये उतरवता येते, पोहचवता येते.. ध्यानस्थपणे स्वतःला एखाद्या पिसाप्रमाणे हवेत सोडुन देऊन हलके होता येते हे सुद्धा वाट्याला आले हे नक्की! अनुभवांचा हा संमिश्र सोहळा पदरी पाडून पूर्ण निरपेक्ष विश्वासाने आता आम्ही उभे आहोत…… पुढे येणार्‍या अनामिक वळणासाठी!!

Written by nileshsakpal

सप्टेंबर 23, 2009 at 4:33 pm

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.