दैनंदिनी – ०६ आणि ०७ ऑक्टोबर २००९
एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जर आयुष्य खर्ची करावे लागणार असेल तर? अन तरीही त्या उत्तराची शाश्वती मिळणार नसेल तर? कुणास ठाऊक एखाद्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘आणखी एक प्रश्न’ असायचा? प्रश्नांमध्ये भरकटणे मला कधीच जमले नाही.. प्रश्नांची सोबत असते, ती नाकारता येत नाही वा तिचे असणे गरजेचेच असते.. या शोधार्थ आयुष्य जगणेही उचित असते… पण कोणता प्रश्न स्वीकारायचा अन कोणता प्रश्न किती महत्वाचा ठरवायचा याचे सर्व अधिकार मात्र हे आपल्यावर असतात.. कुणाला कशाला बर्याच जणांना वैयक्तिक प्रश्नांचे शाप असतात.. वैयक्तिक आयुष्यातून बाहेर डोके काढायला मिळत नाही.. माझे आयुष्य, माझा संसार अन माझे कर्तृत्व इथे अन इथेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणांवर येऊन थांबणे होते…. यात गैर काहीच नाही… पण नेहमीच वाटते की हे तर सगळ्यांच्याच नशिबी आहे.. जरी कितीही नाकारले किंवा कितीही धुडकावले तरी माझे प्रश्न माझेच राहणार, माझा संसार, माझे कर्तृत्व याचा बोझा मलाच वहावा लागणार.. त्यापासून काही सुटका नाही… मग वाटते की हे अशा धोपटमार्गावर जगायचे म्हणजे खरेच योग्य आहे का? की आपल्या वर्तुळाच्या परिघाबाहेरील एखादे उद्दिष्ट जगण्याचा उद्देश करुन घ्यावे अन जगणे सफल करावे… माहीत नाही, नेहमीच हा पर्याय जास्त योग्य वाटतो अन नेहमीच नव्याने स्वीकारला जातो वा डोक्यात भिनला जातो… अगदी लहानपणापासून या मतामध्ये कुठेही फरक नाही पडला… ना शिक्षणाची पूर्तता करताना फरक पडला ना जगातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या काही वर्षामध्ये काम करताना फरक पडला… ना जगातील वेगवेगळ्या भाषिक लोकांशी बोलताना वा त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जपताना जोपासताना फरक पडला… उलट यामुळे एक वेगळाच विश्वास मनात भरीस होता.. कितीतरी लोकांमध्ये हा विश्वास मी पाहीला व त्यांना तो जगताना पाहीला… आपल्या देशामध्ये या जगण्याला जिथे दुर्मिळतेचे लेबल आहे तिथे कितीतरी देशांमध्ये याला वेगळं असं काही स्थान नाही कारण तो त्यांच्या जगण्याचाच भाग आहे… अगदी नायजेरीया, लिबया, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, रशिया, कझाकिस्तान, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, अमेरिका, इंग्लंड (इथे मुद्दाम आखाती देशांचा उल्लेख केला नाही) अशा कितीतरी देशातील नागरिकांशी बोलणे झाले पण बहुसंख्य वेळाला या सुजाण लोकांकडे एक उद्देश असतो म्हणजे असतोच! आपल्या भारतीयांबद्दल कुठेही टीका करण्याचा हेतू नाही पण बर्याचदा आपल्या तरूणांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर नसते… का ते माहीत नाही… खासकरुन मुलींमध्ये तर ही ‘मूकता’ जास्त बोलकी असते.. एवढ्या शिक्षणानंतरसुद्धा जगण्याचा काहीच क्रम न ठरवता येणे याला काय म्हणायचे.. आपल्या शैक्षणिक पद्धतीचे अपयश की आपल्या संगोपनात असलेली एक मोठी तूट??.. कळत नाही….
जगण्याचा एक उद्देश असेल तर मात्र नकळत एका वैश्विक तत्वाशी तुम्ही जोडला जाता.. एका वैश्विक भाषेमध्ये तुम्ही सार्या जगाशी बोलू शकता… नुसतेच मी शिकलो, पहील्या नंबराने पास झालो, परदेशात शिकायला आलो, आता यानंतर इथे नोकरी करेन, लग्न करेन, पैसा मिळवेन, दुसर्या देशात जाईल, तिथे नोकरी करेन.. मग भारतात घर घेईन, मोठा बंगला बांधेन, आई-बापाला मजेत ठेवेन, त्यांचे पांग फेडेन, मुलांना मोठे करेल… ही असली जर उत्तरं डोक्यात असतील तर नवल नाही… पण दुर्दैव! यात कुठेही ‘उद्देश’ नसतो.. आयुष्याच्या पन्नाशीमध्येही जरी हा प्रश्न विचारला तरी उत्तरं ठरलेली असतात… घरी बसेन, पेंशन खाईन, नातवंडांना खेळवेन, हे करेन अन ते करेन… तेव्हासुद्धा काही वेगळे करेन हे उत्तर अशक्य! म्हणजे जेव्हा करण्याचे, तारुण्याचे दिवस होते तेव्हा केले नाही तर मग म्हातारपणात काय अपेक्षा ठेवावी! या जगातील एक घटक व्हायचे असेल तर मित्रांनो आयुष्याला आकार द्या…. विचार करून मार्ग निवडा… प्रत्येक मार्गावर उन्नती आहे.. डोळे झाकुन ग्लोबलायझेशनच्या लाटेवर झोकून देण्यापेक्षा नवी लाट आणण्याचा प्रयत्न करा… वेगळा उद्देश म्हणजे नक्की काय? हा प्रश्न सहाजिक आहे… तो काहीही असू शकतो… कुणाला देशासाठी काहीतरी करावेसे वाटेल, कुणाला मानवजातीसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला एखाद्या खेड्यासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला निसर्गासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला राजकारणासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला वातावरणातील बदलांसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला समाजातील दुर्लक्षितांसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला प्राण्यांसाठी काही करावेसे वाटेल…. यातले किंवा यापलिकडे बरेचसे पर्याय आहेत… अन नवीन पर्याय स्थापित करणारे जर आपल्यातील कुणी असतील तर त्यासारखे सुदैव नाही! नेहमीच्या आयुष्याला नाकारता येत नाही पण फक्त तेवढेच स्वीकारुन जगण्याच्या वैश्विक वरदानाला नाकरणे चुकीचे नाही का? मला जमत नाही, जमणार नाही, माझ्या शक्यतेपलिकडे आहे, उगीच यामध्ये का पडा? या असल्या गोष्टिंचे विटाळ आता काळाच्या अंधार्या खाईत कायमचे झुगारुन द्या… जगण्याला अर्थ द्या.. जगता जगता स्वतः अर्थ होऊन जा.. येणार्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असा जीवनपट मांडून जा…
कितीदा तरी स्वतःला अशा परीस्थितीमध्ये पहात असतो जेव्हा जगण्यापेक्षाही फक्त श्वास घेणं चालू असतं…. जिवंत असूनही मृत भावनांचे ओघळ देहावरुन निथळताना मन भानावर नसतं…. जसं निष्पर्ण झाड एक खोड होऊन उभं असतं, जसं कुंकु पुसलेलं विधवेचं कपाळ कुंकवाचा सुगंध शोधत असतं, जत्रेनंतर उत्सवाच्या खुणा जसं एखादं मैदान जपत असतं तसंच काहीसं कधी कधी तुमचं आमचं झालेलं असतं…. जेव्हा परिस्थितीवर सारं सोडलेलं असतं, वार्यावरचं जगणं स्वीकारलेलं असतं….. गेलेल्या क्षणापाशी कुठेतरी मन अडखळलेलं असतं…. भूतकाळाच्या दोरखंडात वर्तमानाला बांधून भविष्यासाठी उत्तर नसतं तेव्हा हतबलतेच्या जगात आपले आगमन झालेलं असतं… अंधार सगळीकडेच असतो.. अगदी निमिषाच्या अंतरावर तर तो असतो.. फक्त पापण्या मिटल्या की अंधारच अंधार…. गेल्या दोन दिवसात या अशा घटनांचा बेबंद वावर माझ्या आसपास होता.. पण त्याचवेळेला प्रत्येक क्षणी आयुष्यभर जपलेला जगण्याचा उद्देश आठवून देण्याचे काम माझ्या पत्नीने व त्या भगवंताच्या नित्य स्मरणाने केले… पूर येतात, दुष्काळ येतात, भूकंप येतात जगण्यापासून भरकटवणारे कितीतरी महाभयंकर अघोरी विचारही मनपटलावर येतात… या सगळ्यातून उभे करते ती त्या वैश्विक मूलतत्वाशी असलेली आपली एकरुपता… सृष्टीतील सृजन शक्तीबरोबर जर आपले संधान असेल तर मग कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यापेक्षा जास्त आपली काळजी घेतली जाते.. हे अनुभवणे वा ही प्रचिती घेणे यासारखे दुसरे सुख या भूतलावर नाही! फक्त त्यासाठी लागते ती त्या वैश्विक सृजनशक्तीशी गट्टी, बाकी काही नाही!


v inspiring and enlightnning for depressed person .
always write such positive to inspire us all readers
thanks
arun
arun
ऑक्टोबर 13, 2009 at 10:45 सकाळी