गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१०
जवळ जवळ आठ नऊ महिन्यांच्या एका मोठ्या खंडानंतर लिहिण्यास घेतले आहे.. खंड होता तो फक्त या शब्दांकित स्वरुपाला.. खरे काळाचे शब्द तर प्रत्येक पावलावर आपोआप उमटत होते अन याहीपुढे अवतरत राहतील.. असंख्य घटनांचे वादळ अविरतपणे काळाच्या क्षितीजावरुन आयुष्याच्या या रणावर अघोरी शरांचा मुक्तछंद, बेभान वर्षाव करीत होते… कधी कधी अगदी इंद्रधनुष्यावरही संशय यावा की कदाचित याच धनुष्याचाच तर हा छद्मी डाव नसेल ना? इथपर्यंत सैरभैर होणारी अवस्था वास्तवात होती.. प्रत्येक क्षणासरशी पायाखालची जमीन आतमध्ये धसत जावी.. आपण जिथे आहोत तिथेच आपले जिवंत थडगे होईल की काय असे वाटावे.. आयुष्यांच्या सुंदर, चमचमीत कल्पनांच्या मागे एक भेसूर आभास दब्या पावलाने आपले अस्तित्व जपत असतो व सत्यामध्ये येण्यासाठी आसुसत असतो हे पटण्यासाठीच काही योग लिहिलेले असतात.. जेव्हा हिशोब लागण्यापेक्षा हिशोब करणे नको वाटते.. जेव्हा एखाद्या चक्रव्यूहातून सुटून सुखरुप घरी जाण्यापेक्षा चक्रव्यूहाचा हिस्सा होऊन जाण्यात सार्थक वाटते…. असणे नसणे याहीपेक्षा हरवणे जास्त समर्पक असते… आपल्या कटाक्षामध्येच आपल्याला छेदून जाणारे एखादे अस्त्र लपलेले असावे असे प्रतिबिंबातून उमटत असते तेव्हा सावलीचाही तिरस्कार वाटू लागतो..
कल्पनेच्या परे असणार्या अशा भीषण परिस्थितीतून सहीसलामत सुटणे कधीच सहज नसते…. आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हे लिहिण्याचे प्रयोजन इतकेच की गेल्या कित्येक महिन्यांच्या सगळ्या अग्निदिव्यातून, रौद्र महासागरातून जर ही जीवननौका आज पैलतीरावर सुखरुप आली आहे ती फक्त अन फक्त एका दीपस्तंभामुळे म्हणजेच एका सद्गुरुकृपेमुळेच! या अशक्य काळामध्येही जर शाश्वत काय असेल तर ते आहे सद्गुरुतत्व! त्याला समजणे, त्याची मीमांसा करणे हे या तुच्छ देहाचे कामच नाही… त्याचे अढळत्व वादातीत आहे, त्याचा वास सूक्ष्मतम सूक्ष्म आहे अन त्याचा विस्तार अनंत आहे…. तो प्राप्तही आहे अन तो अगम्यही आहे…. तो सिध्द आहे, तो साधकही आहे… तो सहजही आहे तर तोच अनाकलनीयही आहे…. तो सार्या या पंचीकरण पसार्याचा केंद्रबिंदूही आहे अन तोच या सार्यापासून अलिप्तही आहे… तो मी आहे, मी तो आहे… हीच सद्गुरुकृपा जी त्या रामाला वसिष्ठांकडून मिळाली, कृष्णाला सांदिपनींकडून मिळाली … अशी ही सद्गुरुकृपा मिळणे हेच ह्या जगण्याचे फलित आहे.. या अशा जगण्यासाठी मग ह्या संसाराचे शिवधनुष्य पेलणे मान्य आहे!


Waah…..jabardasta lhila ahes ! faarach sunder ani samarpak !
vishal edake
जुलै 24, 2010 at 10:28 pm
aapla swaqgat aahe phar sundar
hemantdabholkar
जुलै 25, 2010 at 3:28 सकाळी
दादा खूप दिवसाने तुमचे लिखाण वाचण्याचा योग आला खूप आनद झाला
नक्कीच काहीतरी अडचण असणार त्यामुळेच अवध खंड पडला लिखाणात
असो तुम्ही असेच लिहिती राहा आणि सुखी राहा हीच श्रीचरणी पार्थना
vikram
जुलै 27, 2010 at 9:42 सकाळी