दैनंदिनी – ३० जुलै २००९
जुलै 31, 2009 यावर आपले मत नोंदवा
साचेबद्धता, पठडीबंद जगणे, एकाच रस्त्यावरून वर्षानुवर्षे प्रवास करणे, एकाच घरात, एकाच ठिकाणी पिढ्यानपिढ्या राहणे चुक आहे का? वेगाचे बंधन नसलेल्या आपल्या पिढीला हे विचार बुरसटलेले अन टुकार वाटतात.. वेडगळ वाटतात.. का?? मग आपले आई-वडील, आजी-आजोबा चूक होते का? आधीच्या पिढ्यांनी जे काही केले ते सगळे कालबाह्य झाले का?
नक्कीच आता महत्वकांक्षेची क्षितीजं विस्तारली आहेत.. आता दहा बाय दहाच्या वाड्यातून साता समुद्रापलिकडील पहाट सहज दिसते, अनुभवता येते किंवा ती साद घालते… अन का करु नये? मुलभूत शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात का जाऊ नये.. गेलेच पाहीजे तिथे सगळ्या सोयीसुविधा आहेत, आमच्या प्रतिभेचा योग्य सन्मान केला जातो अन ती तशीच जोपासलीही जाते, सामाजिक आयुष्य सुरक्षित आहे, बिनधोकपणे कुठे कधीही अन केव्हाही वावरता येते, जगातील सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो अन तेही सहज, विनासायास. आमची सर्वांगीण प्रगती होत राहते, जगातील सर्व उच्चशिक्षितांबरोबर स्पर्धा करता येते, आपली उपयुक्तता सिद्ध करता येते, ठरलेल्या वेळेत कामे होतात, ठरलेल्या वेळात घर गाठता येते, रोज घरच्यांशी ऑनलाईन बोलता येते, आता तर आम्ही एकमेकांना अगदी घरात बसल्यासारखे बघुन बोलू शकतो त्यामुळे घरातील हळव्या लोकांनाही आता काही अडचण नाही, बरेचशे मित्रसुद्धा कितीतरी वेळेला सहज फिरताना इथे सापडतात, इथे सगळ्यांची वेव्हलेंग्थ मॅच होते, येथील वादविवादसुद्धा एकदम शिस्तीत असतात, कुठेही मारामारी किंवा खुन्नस नाही.. सगळे आटोपशीर अन नीटनेटके, मग आम्ही का जाऊ नये इथे??
कुणी असेही म्हणेल की ही परंपरा काही आजची नाही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा IAS किंवा इतर परीक्षा देऊन परदेशात शिकायला येणार्यांची संख्या भरपुर होती अन तिथूनची ही सुरुवात झाली.. आम्हाला दोष देऊन काय फायदा..
किती समर्थनं!! पण या पलिकडे आपण सार्यांनी विचार केलेला नाही किंवा नसतो… ज्यांनी केला ते खरेच धन्य! पण कुणी असा विचार करत नाही की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातून परदेशात शिक्षण घेण्यास येणार्यांचा मूळ उद्देश काय होता? तेव्हा शिक्षणामुळे सारासार बुद्धी आपोआप यायची किंवा शिक्षण घेतलेल्या माणसाला तसाच मान होता, त्याला चांगल्या वाईटाचा विचार करण्याची क्षमता होती.. अन त्यामुळे जास्त शिकलेला देशासाठी जास्त विचार करू शकतो असे समीकरण झाले होते अन ते प्रत्यक्षातही तसेच दिसले… तेव्हा प्रत्येकाला मिळालेले उच्च शिक्षण हे भारताच्या उत्थानासाठी वापरायचे हाच उद्देश होता, परदेशात असलेल्या सुरक्षिततेपेक्षा भारतात असणारी असुरक्षितता अन पारतंत्र्यता त्यांना जास्त आवाहन द्यायची… आज ही आवाहन स्वीकारण्याची धारणाच नाहीशी झाल्याचे दिसते, तरूणपिढीतले तारुण्य वजा असल्यासारखे भासते, शिक्षणामुळे येणार्या तेजापेक्षाही विलासीन सुखांच्या उपभोगाप्रती असलेला पंगुपणा जास्त दिसतो.. गेल्या काही दशकांमध्येच हा देश उत्थानाचा उद्देश पुरेपुर नाहीसा झाला आहे, देशापेक्षाही स्वतःला मोठे समजण्याची घोडचुक करताना आम्ही सगळे आढळतो, माहीत असतानासुद्धा हे करताना प्रौढी मिरवताना बरेच जण दिसतील, देशासाठी खर्च केलेले आयुष्य अनमोल असते यापेक्षाही स्वतःच्या क्षुल्ल्क मोहाच्या पाठी धावताना सुखांच्या गर्दीमध्ये गाडुन घेण्यात सार्थक मानणारी पिढी उदयाला येत आहे… अप्पलपोट्या राज्यकर्त्यांच्या उपर्या धोरणांमुळे होत असलेले खच्चीकरण थांबवणे आता दिवसेंदिवस अशक्यतेच्या जवळ जाऊ लागले आहे, ढासळलेली न्यायव्यवस्था, दिशाहीन झालेले नेतृत्व, एक-दोन विकसित देशांचा आराखडा डीट्टो भारतासारख्या देशामध्ये राबविण्याच्या निष्फळ प्रयत्नापायी झालेले अतोनात नुकसान न भरुण येण्यासारखे आहे, हे ओळखण्याचेही भान नसलेली किंवा हे स्वीकारून वाढणारी तरुणपिधी घडत आहे याचे दुःख वाटते… उगीचच वैयक्तिक सुखाच्या मोहापायी आम्ही आमच्या देशाला मात्र विकासापासुन वंचित राहण्यास किंवा अंधारात खितपत पडण्यास भाग पाडतो आहोत हे देखील न समजलेली म्हणजेच ‘पुढारलेली’ तरुणपिढी येऊ घातली आहे…
शहरीकरणाला विकासाचे नाव देणे म्हणजे एखाद्या अंध व्यक्तीला एखादा मुकपट दाखविण्यासारखे आहे.. आपला विकास अधू आहे हे समजणे किंवा याचा उलगडा तरुण पिढीला झालाच पाहीजे… एखादा देश पुढे नेणे म्हणजे तिथल्या जनतेला किंवा सगळ्यात दुर्लक्षित असलेल्या व्यक्तिला प्रमुख प्रवाहात आणणे होय, आमचा विकास इंग्रजीमधुन होत आहे अन आमचा देश भाषांच्या युद्धामध्ये जखडून पडला आहे… इंग्रजी भाषेचे अनभिषिक्त साम्राज्य आम्ही स्वीकारले आहे… किंवा कोणत्याही खंबीर नेतृत्वाने ते कधीच झुगारले नाही तर ते दोन्ही हाताने स्वीकारले हे ही सत्य आहे… आज रशिया किंवा युरोपातील छोटे छोटे देश किंवा जपान किंवा चीन सगळ्यांनीच आपल्या अस्तित्वाची खुण अबाधीत राखली आहे, आपली ओळख, आपली भाषा, आपली संस्कृती अखंडीत राखली आहे… आमची तरुणपिढी निर्लज्जपणे या लोकांचे गुणगाण गाताना दिसते पण आपल्या देशात हे का नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची धमक वा हिम्मत त्यांच्यात नाहि हेही तेवढेच लाजिरवाणे व बटबटीत उघड सत्य आहे.. एक म्हणुन उभे राहायचे असेल तर परस्परातील मतभेद पहील्यांदा हद्दपार झाले पाहीजेत पण आम्ही अजुनही पुराणकाळातील असणारे फरक घासुन घासुन ठळक करण्याच्या मागे लागलो आहोत… शिक्षणाचा अर्थ सध्या बदलला आहे.. शिक्षण म्हणजे शेपुट गुंडाळून देशाला पाठ लावून पळून जाणे असाच अर्थ समोर दिसत आहे… आपण स्वतःही त्यामध्ये आहोत याचीही खंत वाटत होती पण आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचे मनाशी निश्चित आहे, ठाम आहे… कितीतरी उच्चशिक्षित परत जाऊन देशाच्या पुनर्बांधणीचे काम करीत आहेत हेही आमच्या पाहण्यातुन सुटले नाही… डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे उदाहरण तर नेहमीच जीवंतपणे समोर उभे राहते…
गरजा वाढविणारेही आपण अन निरर्थक चोचल्यांच्या मागे धावणारेही आपणच.. ज्या देशात अजुनही दोन वेळचे जेवण मिळत नाही तिथे घरात मोबाईल पोहचविणारेही आपणच, गावामध्ये रस्ता किंवा माध्यमिक शाळा पोहचविण्याआधी कंम्पुटर पोहचविणारेही आपणच, तंत्रज्ञानाच्या विकासाची दिशा ही विकसित देशांना समांतर धावते आपल्याला देशाच्या विकासाला नाही, त्या तंत्रज्ञानाची दिशा त्या विकसित देशांना पुरक आहे पण आपल्याला आहे का? हा विचार न करणे म्हणजे पुन्हा वीज नसलेल्या गावामध्ये एखाद्या योजनेअंतर्गत वीजेचे खांब बसविण्यासारखेच! भारत म्हणजे चार शहरांचा नाही तर तो चार हजार गावांचा आहे हे आपण विसरून गेलो आहोत.. चार-सहा शहरांच्या विकासावर भारताचा अमेरीका नाही होणार तर शिस्तबद्ध विकासाची जोपर्यंत पायाभरणी होत नाही, खेड्यातील माणुसही या विकासात सहभागी होत नाही तोपर्यंत सारे प्रयत्न निरर्थक आहेत, तंत्रज्ञान विकसित करताना फक्त शहरी लोकांचा विचार करून विकसित होते, पण ते एखाद्या खेडुताच्या दृष्टिकोनातून कधीच विकसित होत नाही हे आमचे दुर्दैव! दोन चार पिढ्यांआधी आपणही खेडवळ होतो हे आपण विसरून गेलो आहोत, समोरचा खेडवळ माणुस वर्षानुवर्षे तसाच आहे अन तो तसाच वागतो आहे, तरी आपण त्याला हसतो, पण खरेतर मित्रहो आपण बदललो आहोत हे सत्य आहे!! त्याला हसताना दात आपले दिसत असतात.. आपण आपल्यावर हसत असतो…. अन तो मुकपणे भारत खांद्यावर घेऊन समोरुन रस्त्यावरील धुळीमध्ये खर्या भारताचे ठसे उमटवत चालत राहतो………
क्रांती उद्वेगातून होते, समाजातील विषमतेचा लाव्हा उफाळला की क्रांती होते, उलथापालथ होते पण त्यासाठीही तो बदलाचा मुद्दा प्रत्येक मनात झिरपावा लागतो.. मित्रहो, कुठेतरी ही विषमता आता दिवसेंदिवस जास्त स्पष्ट होऊ लागली आहे.. प्रत्येक थराला प्रगती प्रवाहामध्ये येण्याची गरज वाटू लागली आहे… पद्धतशीर किंवा साचेबद्ध विकास न झाल्याने एखाद्या झाडावरील पाखरांचा जत्था उडावा अशी परीस्थिती देशात उभी आहे… या खदखदलेल्या असंतोषाला कदचित ‘शिकलेल्या’ तरुणपिढीची गरज आहे असे वाटून गेले म्हणून हा प्रपंच! कुणाच्या भावना नकळतसुद्धा दुखावल्या असतील तर क्षमस्व! ताशेरे ओढण्यापेक्षाही एखाद्या तरूणाला तरी सुखासीनतेपासून वास्तवतेकडे खेचण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे…
काल दिवसभरातील हे विचार असेच सहज उतरले गेले आहेत… वेगवेगळ्या भावनांपेक्षाही जेव्हा एकच भावना आपल्या जगण्यावर हावी होते तेव्हा हे विचार एकाच दिशेने अशा पद्धतीने सुरु होतात.. चाबुक फिरवताना चाबकापेक्षा चाबुक फिरवणार्याला जास्त विचार करावा लागतो… तसेच आपले आहे… आपण नित्य वावरताना जो आपल्याला चालायला किंवा बोलायला भाग पाडत आहे तो विश्वविधाता नक्कीच सर्व विचारांती असे विचार माझ्या पारड्यात टाकत असेल किंवा असावा.. त्याला अपेक्षित असणार्या व त्याच्या संकेतचिन्हांवर समर्पित भावनेने चालत राहणे जास्त योग्य, असेच वाटते व पटतेही!
प्रतिक्रिया