पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै २०१०
जुलै 27, 2010 2 प्रतिक्रिया
कधीतरी पावसात भिजवून मन रमवणारे पाऊसवेडे चातक बरेच आहेत… अगदी रोजच्या घडीला कितीतरी वेळा हे असे पाऊसप्रवासी नजरेसमोर मुसळधार पावसामध्ये विरघळताना दिसत असतात… कुणी आपल्या संसाराच्या गाठोड्याला खांद्यावरून त्याची होडी करुन पाण्यामध्ये सोडून देतो तर कुणी उद्या काय होणार या सामान्य प्रश्नाला कवटाळून पावसामध्ये आपले चिंतांचे कापसी ओझे भिजवून रस्त्यावरून सरपटताना दिसतो… कुणी पक्षी अगदी झाडाच्या कोवळ्या फांदीवर बसून आपले अधिराज्य गाजवताना दिसतो तर त्याचवेळेला या निसर्गाच्या नव्या नवलाईला दूर सारून डांबरी रस्त्यावर एखाद्या नव्या खड्ड्याच्या तक्रारीमध्ये त्रासलेला एखादा बुद्धिमान प्राणी दिसतो… कुठे एका बाजूला पांडुरंगावर सगळा भार सोपवून त्याच्या नामघोषामध्ये या पावसाचा टाळ करुन, या पावसाचा मृदंग करुन, या पावसाचा अभंग करुन त्या विठुमाऊलीकडे निघालेली यात्रिकांची आषाढवारी दिसते..
गेल्या पाच सहा वर्षामध्ये भारतातला पाऊस अनुभवला नव्हता.. जो काही होता तो फक्त बातम्यांमधून अन इथल्या फोटोंमधून.. यावेळी मात्र अगदी दूर गेलेल्या जुन्या मित्राप्रमाणे कडकडून गळ्यात पडला… त्याच जुन्या त्वेषामध्ये अन त्याच त्याच्या नेहमीच्या तालामध्ये… जणू काही सांगत होता की बघ या एकाच निसर्गामध्ये तू अन मी दोघे जगत आहोत, पण मी अजून तसाच मुक्त, मोकळा कोसळतो… अन तू दिवसेंदिवस एखाद्या जुन्या तलावाप्रमाणे आटत आटत चाललायस…. सार्या विश्वाला सताड बाहुंनी गवसणी कशी घालायची हे मात्र शिकावं ते या पावसाकडूनच… तो ना घड्याळाच्या काट्याला बांधलेला असतो ना तो कोण्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीभोवती घुटमळत असतो… वर्षभराचे मळभ साचलेल्या आपल्या नजरा, आपले कोते झालेले दृष्टिकोन पुसून टाकण्यासाठी, धुवून टाकण्यासाठीच हा देवदूत आपल्याकडे झेपावत असेल… त्याचा ओला संदेश घेऊन माती सुगंधित होते.. त्याच्याकडून जीवन घेऊन कितीतरी नवी रोपटी आकाशाचे स्वप्न जोपासू लागतात… अन त्याचवेळेला आपल्यातला माणूस मात्र या पावसाचे आभार मानण्याचे विसरून जाताना दिसतो हीच ओली खंत मनामध्ये अंकुरत रहते…
अजूनही दैनंदिनी लिहावी की असंच जेव्हा वाटेल तेव्हा लिहावे हे काही केल्या नक्की होत नाहीये… लवकरच काहीतरी निर्णय व्हावा हीच अपेक्षा… विचारांशी प्रामाणिक राहणे जमावे.. उठणार्या प्रत्येक भावस्पंदनाला त्याच्या हक्काचे आभाळ देता यावे म्हणुन आणखी कसोशीने यत्न करावे… खळबळ वा उफाळणारा अग्नीचा समर्पक सार्थ बहुमान कराता यावा…. भ्रष्ट व कुनीतीपुर्वक काळवंडणार्या ढगांना क्षितीजापलिकडे दूर ढकलता यावे….. अन यानंतर उभ्या राहणार्या सुसंवादासाठी शब्दांना साकडे घालणे मात्र असेच सुरु राहील!!!
प्रतिक्रिया