“आत्मविश्वास”

तालेवार जगणे ज्यांचे,
लखलाभ ही चंदेरी दुनिया त्यांना!
माती फासून माथ्यावरी,
आमचे ताटवे भेदती आभाळांना!

लागता अहंतेचा लळा,
नसे मात्रा छिद्र पडल्या जहाजांना!
विखार शरमला विषाचा,
शब्दरुप मिळता कपटी विचारांना!

दुःख असावे मलमली,
महाली विनासायास झुरणार्‍यांना!
कृतघ्न म्हणावे जगाला,
दृष्टी छेदूनी आरसे विकणार्‍यांना!

अलौकिक होता विजय,
तो आनंद काडीमोल गुलामांना!
कोण शहीद सीमेवरती,
काय फरक पडतो निर्वासितांना!

दुर्मिळ आणि दुरापास्त,
औषध नाही आमच्या स्वभावांना!
गळ्यात पडू वा लाथाडू,
जुमानत नाही कुणा सावकारांना!

व्यर्थ भय मोह-बंधनांचे,
वेळ येता फिरवू या ग्रहतार्‍यांना!
सशक्त आमचे वज्रबाहू,
पाजू पाणी वाटेतील पत्थरांना!

गवसेल यशाचे गमक,
फुटेल आवाज जेव्हा वेदनांना!
लढुन उरलो सार्‍यांशी,
आता आव्हान येणार्‍या पिढ्यांना!

-निलेश सकपाळ
१४-१२-२०२३

“पुनर्जन्म”

गरजत होते पण कळत नव्हते,

खूप दाटले तरी बरसत नव्हते,

नवेच ढग असावे आजकालचे,

दारातूनी पुढे ते सरकत नव्हते!

झिरपत होते पण मुरत नव्हते,

दुःख मलमली ते संपत नव्हते,

आणाभाका नुसत्या कसल्या,

तेल संपूनी दिवे विझत नव्हते!

अवगत होते पण वळत नव्हते,

अन् गुंत्यावाचून करमत नव्हते,

विषाद माळले जरी धाग्यातूनी,

तुटुदे म्हणूनीही ते तुटत नव्हते!

वरचढ होते पण जिंकत नव्हते,

शत्रू माझे एवढेही सरळ नव्हते,

घमासान झाले जरी आता इथे,

शत्रूविना कुणी जिवलग नव्हते!

अवखळ होते पण सहज नव्हते,

माझे मीपण मज गवसत नव्हते,

ग्रीष्मात ओलावा आणला कुणी,

कोरड्या परसास उमगत नव्हते!

अवघड होते पण अटळ नव्हते,

मृत्यूस काळ, वेळ, प्रहर नव्हते,

गळाभेट घेईन त्या सवंगड्याची,

या क्षणी त्याचेही दडपण नव्हते!

खडतर होते पण सपक नव्हते,

जगण्यास यशाचे अत्तर नव्हते,

मोगऱ्यास वेड लागता चाफ्याचे,

पुनर्जन्मावाचूनी गत्यंतर नव्हते!!

-निलेश सकपाळ

२८ नोव्हेंबर २०२३

पाऊस न पाहिलेला माणुस!

रुजणार्‍या एखाद्या बियाण्याला नाकारण्याचा अधिकार ओल्या मातीला कधीच नसतो, मग भले त्या बियाण्यातून उदय होणार्‍या रोपट्यामध्ये मातीला नासवण्याचे विष का पेरले असेल. ऋणानुंबंध असणार्‍या मानवी स्वभावातील गुंतागुंत जेव्हा नकळत शब्दांची श्रृंखला खंडीत करायला लागते, जिभेचे आणि हृदयातून कंप पावणार्‍या भावनांचे अघोषित युध्द सुरु होते, मेंदू बिगुल फुंकुन अदृश्य मनपटलावर युध्दाचे तांडव सुरु करण्यास अनुमोदन देतो, तेव्हा धारदार शब्दांची अस्त्रे गिळावी लागतात, अनंत जखमांनी स्वतःला पोखरुन घ्यावे लागते, न दिसणार्‍या अन कधीही न अनुभवलेल्या यातनांच्या अंगणामध्ये याचनेची झोळी लपवुन स्वाभिमानाच्या वाश्याला पकडून घट्ट उभे रहावे लागते. विजा कडाडल्या अन त्या जिथे अवतरल्या तिथे होणार्‍या नुकसानाचे अंदाज कधीही पाऊस न पाहिलेला माणूस कसा काय लावू शकेल! ज्या सुगंधाचे आयुष्य फुलाच्या कोमेजल्यानंतर वार्‍यामध्ये शोधावे लागते किंवा आठवणीच्या साठवणीमध्ये चाचपडावे लागते त्या सुगंधाला अमरत्व कसे बहाल करायचे, अन ते फुल त्या बागेतील नव्हे तर या धरतीवरील शेवटचे फुल असेल तर! तो सुगंध पुन्हा कसा सापडावा, तो गेलेला क्षण ज्यामध्ये त्या सुगंधाचे अस्तित्व कैद होते तो क्षण त्या काळाच्या पोटामध्ये जाऊन कसा पुन्हा मिळवायचा! हट्ट फुलाचा असेल वा सुगंधाचा वा त्या अनुभुतीतुन उत्पन्न झालेल्या सुखाचा, हा हट्टदेखील तेवढाच क्षणभंगुर मानायचा का? यातना हे वेदनेचे दृश्यस्वरुप म्हणता येईल पण यातना प्रकट होण्याआधी त्यामागची वेदना संपुन गेलेली असते, सद्य क्षणास कदाचित अनुभवली जाणारी वेदना असते अन यातना आधीच्या क्षणाची मोहोर असते!

आवाजाचा माग काढणं सोप्प असतं का? जोपर्यंत आवाज आणि त्याची कंपनं शाबित असतात तो पर्यंत दिशा कळाली तर ठिक नाहीतर पुढच्या येणार्‍या सादेची चाहुल लागेपर्यंत आधी ऐकलेल्या आवाजाचे वेड सर्वांगामध्ये भिनवावे लागते! पुढची साद येईल याची शश्वती ज्याची त्याने मिळवायची असते! इथे एकच लक्षात ठेवावे लागते ते म्हणजे आवाजाच्या मागे धावताना ना रस्ते पुरे पडतात, ना दर्‍या-खोर्‍या, ना डोंगर-शिखरे, ना नद्या-धबधबे, ना महिने-वर्षे, ना जन्म-मृत्यू! फक्त दिशा बाणावर ठेवुन प्रत्यंचा ओढुन स्वतःचे सर्वस्व शून्यात विरणार्‍या भोवर्‍यामध्ये वाहून द्यायचे असते!

पाऊस न पाहिलेला माणुस जेव्हा वादळाचा पदर शोधू जातो, काळ्या ढगांची चादर ओढुन उब मागू जातो, ढगाळलेल्या वातावरणामध्ये आकाशाखाली सारीपाट मांडू जातो तेव्हा काय कराल!! ज्याने ना मृदगंध श्वासातून अंतरंगामध्ये घेतला आहे, ना त्याने खळखळून वाहणार्‍या नद्यांच्या संगिताचे श्रवण केले आहे, ना रानोमाळातून पावसाकडे आतुरतेने धावणार्‍या पक्षांचा किलबिलाट पाहिला आहे, ना थेंबाथेंबातून मातीच्या कणाकणाला होणारा पावसाचा अभिषेक पाहिला आहे! रखरखीत वाळवंटाचा शुष्क सोबती असणारा हा पाऊस न पाहिलेला माणुस अतरंगी वाटतो.

हळुहळु आपल्याही आतमध्ये कुठेतरी एक वाळवंट तयार होत आहे आणि असणारा ओलावाही दुरापास्त होत आहे, काहीही असो, पाऊस न पाहिलेला माणुस आपली वसाहत वाढवत आहे हे मात्र खरं!!

-निलेश सकपाळ
१३ ओक्टोबर २०२३

तारतम्य

वर्तुळात नाडलो परिघाशी भांडलो

वेडास शहाणपणा भासवत राहिलो!

मिळावे किती तेही झोळीने सांगावे

पंखांना कुचकामी समजत राहिलो!

भेटले यात्रिक अन् किती आपले ते

साऱ्यांशी एकसारखे वागत राहिलो!

असावा नसावा जगास तो ओलावा

दोन आसवांत जीवन वाहत राहिलो!

श्वास मोजावे एवढा का वेळ असतो?

मोठा की छोटा काटा शोधत राहिलो!

तारतम्य असावे वाटेला प्रवासामध्ये,

भटकणे व्यर्थ सारे ते मानत राहिलो!

असतो चेहरा एखादा असा लाघवी!

स्वतःला जुगारात मग मांडत राहिलो!

दे एवढे आता की मृत्यूही न कळावा,

पैलतीराचे कोडे ते उलगडत राहिलो!

निलेश सकपाळ

१० जून २०२३

शून्य झालेल्या आठवणीमध्ये वर्तमानातील एखादी ठेच अंगार फुंकुन जाते अन भुतकाळाचा वणवा क्षणार्धात आपल्याला गुरफटुन टाकतो! वाट कितीही ओळखीची असली तरी चुकामुक होऊ लागते, आरशातील प्रतिबिंबाशीदेखील नजरानजर होत नाही.. आपलीच नजर आपल्याला आरपार छेदुन जाण्याचा प्रयत्न करते.. आपली विचारांची तोफ आपल्याला एखाद्या उंच सुळक्यावर नेऊन ठेवते… आपले अस्तित्व काडीमोल वाटुन अंतरी असलेल्या कधीही न पुटपुटलेल्या शब्दांचे दडपण खोल दरीस आव्हान देऊ लागते.. निस्वार्थपणा वागण्यात असला तरी जेव्हा कृतार्थपणा मुळापर्यंत झिरपत नाही तेव्हा अहंकार अनाहुतपणे वर्तमानावर तरंगू लागतो.. तेव्हा होणारी खळबळ ही स्वत:च्या विनाशाचे कारण असू शकते किंवा येऊ घातलेल्या असंख्य वादळांची नांदी असू शकते. अतर्क्य आणि दुर्बोध वाटणारे शब्द जेव्हा धुक्यातुन वाट काढत मनाच्या फांदीवरुन दवबिंदुसारखे हृदयात येऊन न समजलेल्या घटनांचा अर्थ उलगडू लागतात आणि आपण आपल्या मनातील होणार्‍या घटनांचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होऊ लागतो, काहीसे नकोसे पण हवेहवेसे वाटणारे थंडीचे बोचरे वारे निर्जीव जख्मांचा माग घेऊन यातनांना आपल्या पदरात दान देऊ लागते तेव्हा कदाचित एका टिंबात संपुन जाण्याची अनुभुती आल्याशिवाय रहात नाही.

भुभागावर उठणार्‍या अनंत कंपनांचा आणि होणार्‍या आवर्तनांचा हिस्सा होणं किंवा ते अनुभवणं याचा आशिर्वाद प्रत्येक मर्त्य मानवाला असेलच असे नाही.. बेलाशक, सुमारपणे होणार्‍या, घडणार्‍या हालचालींचा अन्वयार्थ जोडण्यात कितीतरी जिवांना सार्थकता वाटत असते आणि यामधुन जागा होणारा परस्पर अर्थ त्या जीवांना कोणती ठराविक दिशा देत असेल यावर तुर्तास काहीही म्हणणे माझ्या विवेकबुध्दीच्या परे आहे. निसर्गातील बदलत्या समीकरणांशी नकळतपणे आपण जुळवुन घेतो किंवा कधीकधी शरण जाऊन बदलांचे स्वागत करतो.. पण जेव्हा बदल मान्य नसतील तेव्हा किंवा समीकरणांची होणारी उकल आपल्या तार्किकतेशी मेळ खात नसेल तर.. आपण बंड करू शकतो का आणि तेही दस्तुरखुद्द निसर्गाशी! आपल्या स्वभावाची खोली आपल्यापेक्षा निसर्गाला किंवा त्या विधात्याला अवगत असणारच.. पण त्यानंतरही या परिस्थितीमध्ये सापडणे हेसुद्धा कदाचित पुर्वनियोजित नसेल कशावरुन! पण हा संघर्ष, हे मंथन भाळावरील ओली जखम म्हणुन सदैव मिरवावी लागते हेही तितकेच खरे!

अंधार

रात्रीस असणारी चंदेरी किनार शोधण्यासाठी अन अंधाराचा माग घेण्यासाठी हातात दिवा असणे केवळ निरर्थकच! अंधाराचा वेध घेण्याचे वेड सहजासहजी मिळत नाही.. अंधारात स्वतःला झोकुन अंधारापलिकडे जाण्यासाठी किंवा अंधाराचे आयाम शोधण्यासाठीची आस जागृत होणे, अंधाराचा दूत होऊन उजेडाला साद घालण्याची मोहिनी ती वेगळीच! अंधाराचे हात, पाय, कान, डोळे सगळे काही म्हणजे अंधारच! अंधारच सुरुवात अन अंधारच शेवट, सर्व काही पोटात घेणारा अवलीया म्हणजे अंधार!

डोळ्यांनी दिसणारा अंधार, अंतरंगात असणारा अंधार अन एखाद्या विचारात असणारा अंधार हा वेगळाच! गर्तेत हरवल्यानंतर शेवटच्या हताशपणामुळे अन विवशतेमुळे आलेले सुन्न टोक म्हणजे अंधार असेल तर ते केवळ चुकच! अंधार काही मागत नाही आणि कोणताही भेद न ठेवता हात पुढे करतो, घाबरणार्‍या जीवांना अंधाराचे अंतरंग कळणे दुरापास्तच! अंधाराशी गप्पा मारणे, अंधाराशी सलगी करणे, न दिसणार्‍या प्रतिबिंबामध्ये हरखुन जाणे… जगातील प्रत्येक गोष्टीला वा त्या सावलीला एकमान्य करुन घेऊन आपलंसं करणार्‍या अंधाराला समजुन घेण्याची धडपड करणारे सर्वसामान्य असूच शकणार नाही!

अंधार कितीही भयावह असला तरी लांब सारत नाही, पोटात घेतो, सामावुन टाकतो, आपले त्याचे अस्तित्व एका ठिपक्यामध्ये मुद्रित करुन टाकतो, अंधाराशी सलगी केली म्हणजे उजेडाचा तिरस्कार हे काही मनाला पटत नाही… उजेड डोळे दिपवणारा, आयुष्य तेजाळुन टाकणारा अनुभव आहे तर अंधार ती अनंत पोकळी आहे ज्यामध्ये उजेडाचे घर उभे आहे!

“चैत्रसृजन”

येई नभातुनी आवाज,

जरी वाटे पलिकडचा

कंपने उठती अंतरात,

रिता आभास मौनाचा

कवेत निर्माणाचे गुज,

डोळ्यांत चंद्र आशेचा

ढगांचे गायन अंबरात,

सडा अंगनी नक्षत्रांचा

सावलीस हवा चेहरा,

नी आधार अंधाराचा!

दीपमाळ साज करी,

टिळा लावी उजेडाचा!

माग काढती पापण्या,

या अश्रुंतल्या सलाचा!

कोणास सांग भेटावे?

बाजार उठता बिंबांचा!

धैर्य राखा पायवाटांनो,

सुक्काळ हा रस्त्यांचा!

जुने म्हणजे जर्जर नाही,

लाभता घन अमृताचा!

सप्तरंगी न्हाले शिवार,

भास तुझ्या कटाक्षाचा!

आज चैत्रसृजन घडले

तुझा पदर मोगर्‍याचा!

कळे द्यायचेच राहिले,

होता लेखा संचिताचा

केले सोहळे भक्तीचे,

भाव नेणता शबरीचा?

चल पुन्हा फेर धरुया,

गाऊ महिमा पंढरीचा

स्वप्न जोपासले रेशमी,

होऊ मातीत मातीचा!

-निलेश सकपाळ

११ ओक्टोबर २०२२

भलावण!

भलावण!

भलावण भलत्या भुतांची,
वेशीवर लटकणार्‍या कथांची!
नी हर दोन श्वासांमध्ये,
क्षणभर मरणार्‍या माणसांची!

तुंबल्या डोहातील तरंग,
आळवतील गीते सागराची!
रक्तास डोळ्यांत आणता,
बदलते वहिवाट विद्रोहाची!

लल्लाटी तख्त जे भुषविती,
त्यांची रहगुजर उसनवारीची!
भरजरी दुःखास ते पाळती,
ज्यांची छप्परे चंद्र-चांदण्यांची!

जपा तुमचे स्वप्नांचे इमले,
आली मिरवणुक प्रस्थापितांची!
वळता मुठी, झुकले मुंडके,
गुलामांनो याद ठेवा लिलावाची!

मरावे आपल्याच बाणाने,
नी शिक्षा मिळावी जन्मठेपेची!
कुणास जेतेपद दाखवावे,
शत्रूत जेव्हा नांदी स्वकीयांची!

लाटेस लाभला तो किनारा,
तीच वेळ होती लाट संपण्याची!
जरी म्हणावे सारे व्यर्थ होते,
तितकीच खरी भेट जाणिवांची!

-निलेश सकपाळ
२२ ऑगस्ट २०२२

तळ

सगळे झुगारुन,
निघावे, तळ गाठावा!
सहवास गोठण्याआधी,
थोडे जड व्हावे!

तरंगांशी भांडण नाही,
क्षणिक शहारा,
नकोसा वाटतो!

भोवताली,
नजरभर निळाई,
किरणांचा सारीपाट,
खेळावासा वाटतो!

दडपण,
घुसमट,
सगळे शून्य होऊन,
सर्वांग पाणीमय,
नव्हे पाणीच होऊन जावे!

जाणिवा,
नेणिवा,
आठवणींचे वळ,
बंधनांचे साखळदंड,
मायेचे अवजड उच्छवास,
संशयाचा गोंगाट,
उद्याची उर्मी,
आजचे भकासपण,
विरघळुन जावे!

स्वतःला स्वतःमधुन
वजा करुन,
अथांग, खोल सागरास
सादर व्हावे,
लाटांचे अभिष्टचिंतन
स्वीकारावे,
आणि, तळाकडे निघावे!


निलेश सकपाळ
०९ जून २०२२

अस्वस्थता

आजूबाजूची अस्वस्थता आपल्यामध्ये नाही म्हटले तरी कणाकणाने झिरपत असते, आपल्यामधील अस्वस्थततेत भर टकत राहते, कधी वर्तमानपत्रांतून, कधी दूरचित्रवाणीवरुन तर कधी इतर समाजमाध्यमांमधून आपल्यापर्यंतचा पल्ला पार होतो. एखाद्या नाजूक क्षणी, आपण बेसावध असताना ही सभोवतालची अस्वस्थता आपल्याशी सलगी करते. ही अस्वस्थता किंवा याला entropy असे म्हणतात, याची व्याख्या म्हटली तर  degree of disorder or randomness in the system. आणि ही अस्वस्थता नेहमी चढ्या क्रमाने वाढतच असते. अगदी आपल्या क्षणिक वैचारिक स्पंदनांमुळे या अस्वस्थतेमध्ये किंवा  entropy मध्ये भर पडतच असते…

अस्वस्थता ही कधीही कायम चांगली अथवा कायम वाईट नसते.  एखाद्या निकालापूर्वीची अवस्था असेल वा शेवटच्या घटका मोजणार्‍या पेशंटच्या नातेवाईकांची नको असलेली बातमी ऐकण्यापूर्वीची संभ्रमी अवस्था असेल वा नवयुगुलांची पहिल्या भेटीवेळी, पहिल्या स्पर्शापूर्वीची अनामिक अवस्था असेल वा शत्रू दोन हात लांब असताना लपून राहिलेल्या लढवय्याची झेप घेण्यापूर्वीची अवस्था असेल वा एखादी चूक सापडल्यानंतर मोठ्यांना सामोरे जातानाची अवस्था असेल.. या सगळ्या प्रसंगात अस्वस्थता आहेच.. पण ती वेगळ्या रुपात अन वेगळया ढंगात नजरेस येते…

अस्वस्थता ही कधी एखादी भळभळती जखमसुध्दा असू शकते, स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या क्रांतिकारकांसाठी भारतमातेच्या गुलामगिरीत होणारी घुसमट अशीच काहीशी न संपणारी जखम होती.. लाखोंनी या जखमेला जवळ केले आणि शेवटच्या श्वासापर्यंत या अस्वस्थतेला भाळावरील भूषण म्हणून मिरविले…स्वराज्यासाठी अशीच अस्वस्थता छत्रपतींनी आणि मावळ्यांनी धमन्याधमन्यांमधून अंतरी उजवली..

कुठल्याच प्रश्नाचे वा विवंचनेचे अस्वस्थता हे कधी उत्तर असू शकत नाही पण उत्तरापर्यंत पोहचण्यासाठीची अनिवार्य अट आहे.. अस्वस्थता एखाद्या उजाड माळरानावरील घोंघावणारा, गोल चक्रात फिरणारा निरर्थक वारा असू शकेल, एखादा निनावी आभाळात वावरणारा करडा ढग असू शकेल जो कदाचित एकटा पाऊस नाही पाडू शकत फक्त हूल देत राहतो अन् अचानक विरुन जातो, एखाद्या गुर्‍हाळातील बेमतलब वाजणार्‍या घुंगराचा नाद असू शकेल जो फक्त ताल निर्माण करतो पण शेवटी त्याचा उद्देश हा तहान जागवणे असतो अन् सांगितिक उपासनेशी काहीही संबंध नसतो…एखादा विजेच्या तारेला लटकलेला पतंग असेल जो उडत असतो पण कालांतराने अन ऋतुमानाप्रमाणे फाटणारच आहे अन उरणार फक्त तो धागा आणि सांगाडा… एखादे उत्तुंग शिखरावरील एकटे वाटणारे पण अभिमानाने जगणारे, फुलणारे, वाढणारे झाड असेल ज्याच्या जगण्याची झिंग गमणे सहसा जमणार नाही…. अस्वस्थता म्हंटले तर रांगणार्‍याला चालायला लावेल, चालणार्‍याला धावायला आणि धावणार्‍याला उडायला लावेल…..

अस्वस्थतता ही ठरवले तर बारुद आहे… जगण्यामध्ये ठासून भरण्यासाठी, मनगटामध्ये उन्मादाचे नाते जोडण्यासाठी, काळाचे पंख घेऊन भविष्यावर चाल करुन जाण्यासाठी, जमिनीवर पाय रोवून आकाशाला आव्हान देण्यासाठी, अस्तित्वाच्या चिंधड्या होत असताना जुनी कात टाकून माणिक होऊन झळाळण्यासाठी, आपल्या अंतरिच्या राक्षसाला झुगारुन आपल्यातील राम सिध्द करण्यासाठी! कमकुवत मनसुब्याच्या आदिमांना अस्वस्थता नेस्तनाबुत करते, श्वासांचे ओझे होते अन ध्येयाचे, ध्यासाचे वेड कायमचे पारखे होते, स्वतःची नजरसुद्धा शत्रू होते… संशयाचे भूत,आशंकांचा वणवा हलकल्लोळ माजवतो, भावनांच्या जंजाळामध्ये ‘जीवन’ या ईश्वरीय वरदानाची मात्र राखरांगोळी झाल्याशिवाय राहत नाही!

अस्वस्थता शोधता येत नाही तर शोध घ्यायला जी उद्युक्त करते ती अस्वस्थता आहे… अस्वस्थता जशी फलप्राप्तीकडे नेणारी नशा आहे तशीच यशाच्या शिखरावर असताना अभिमानातून आलेली दिशाहीन मस्तीसुध्दा आहे.. … साधुंनी, संतमहात्म्यांनी या अस्वस्थतेच्या वारुला काबुत करुन साधनेचे फलित साध्य केले.. अस्वस्थता अमान्य करुन जगता येणं अशक्य आहे कारण ती असतेच असते.. ती दिसो अथवा न दिसो!

निलेश सकपाळ
– ०३ जून २०२२